दिल्ली : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आमि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून त्यांनी दिल्ली विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात यावेत आणि निवडणूक आयोगाने आपच्या स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत तरतूद करावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांसाठी जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आणि असे हल्ले करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर त्वरित अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शनिवारी आम आदमी पक्षाचे रिठाला विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र गोयल यांच्यावर प्रचारसभेदरम्यान हल्ला झाल्याचं वृत्त आलं होतं. या हल्ल्यात गोयल हे बेशुद्ध झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांना शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पीसीआर कॉलवरून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला आणि तो कुणी केला, याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Post a Comment
0 Comments