Type Here to Get Search Results !

रोहित पवारांची 'संघर्ष यात्रा' परत सुरु होणार; हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोहोचणार नागपुरात...


रोहित पवारांची 'संघर्ष यात्रा'
परत सुरु होणार; हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोहोचणार नागपुरात...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांची स्थगित झालेली संघर्ष यात्रा

आता दिवाळीनंतर पुन्हा सुरु होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनामुळे रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा स्थगित केली होती.

राज्यातील युवावर्गाला भेडसावणारे नेमके प्रश्न घेऊन रोहित पवार यांची संघर्ष यात्रा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपूरला पोहोचणार आहे. यंदाची दिवाळी रोहित पवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत तसेच नांदेड येथील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासह साजरी करणार आहेत. रोहित पवार यांची संघर्ष यात्रा ही ८०० किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला १७ ते १८ किलोमीटरचा प्रवास असेल.

पहिला टप्पा ११ किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव आणि नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे.

यासंदर्भात रोहित पवार म्हणाले की, या संघर्ष यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरदेखील भविष्यात काम करण्याचे नियोजन करणार आहे. तसेच, सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे. त्या समस्या जाणून घेणारं कोणी नाही. त्यांच्यासाठी मी असणार आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments