Type Here to Get Search Results !

कल्याण लोकसभेची बदल ! 'या' भाजप आमदाराच्या मुलाची राजकारणात एन्ट्री...


 कल्याण लोकसभेची बदल ! 'या' भाजप आमदाराच्या मुलाची राजकारणात एन्ट्री

कल्याण : राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाचा विकास होत आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 2024 मध्ये पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा प्रण एनडीएतील सर्वच घटक पक्षांनी घेतला आहे.

महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. मोदींना पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आणण्यासाठी अजित पवार गट आणि शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. परंतु असे असले तरी या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मात्र मोठी चढाओढ असल्याचे यला मिळते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा आणि आता त्यांच्या जोडीला आलेला अजित पवार गट महायुतीत एकत्रित लढविणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, राज्यातील काही महत्त्वाच्या जागा या कळीचा मुद्दा ठरणार आहेत. त्यातही कल्याण लोकसभा मतदारसंघावरून सुरू असलेला वाद हा थांबला असल्याचे म्हटले जात असताना आता भाजपच्या एका आमदाराच्या मुलाच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे हा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू होते. ज्यानंतर या दोघांमधील स्थानिक पातळीवरील वाढता वाद पाहता केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करत श्रीकांत शिंदे आणि गणपत गायकवाड यांच्यात दिलजमाई केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.

पण आता कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कित्येक वर्षांपासून समाजकारणातून काम करणाऱ्या वैभव गायकडवाड याच्यावर पक्षानेच मोठी जबाबदारी दिल्याने आता कल्याण लोकसभेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कल्याण शहरात सध्या युवा नेतृत्वात भर पडली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गटातील युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, शिंदे गटातील कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, मनसे आमदार यांचे बंधू कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील हे युवा कल्याणमध्ये कार्यरत असतानाच आता वैभव गायकवाड यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

वैभव गायकवाड यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर त्या संदर्भातील अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते. परंतु हे बॅनर शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी झाकत त्या जागी दुसरे बॅनर लावल्याची चर्चा करण्यात येत आहे. परंतु, याबाबत बोलताना वैभव गायकवाड म्हणाले की, चांगल्या राजकारणाची सुरवात व्हावी म्हणून मी राजकारणात आलो आहे. चेन्ज द सिस्टीम, आय एम सिस्टम त्याच गोष्टीसाठी मी आलो आहे. माझ्या बॅनरवर काही लोकांनी बॅनर लावले झाकण्यासाठी, मी समजून गेलो माजी सुरुवात झाली आहे, मी वाद नाही करणार. बॅनर काढतील पण लोकांच्या मनातून मला कोणी काढू शकत नाही, असा टोला या युवा नेत्याने विरोधकांना लगावला आहे.

तर, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुलालाच राजकारणाच्या मैदानात उतरवून लढत निर्माण केली आहे. त्याशिवाय आमदार गायकवाड यांचा उत्तम जनसंपर्क असल्याने ते तीनदा निवडून आले आहेत. त्यामुळे वडिल निवडून येत असताना वैभव हे प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी त्यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात वैभव यांचा आमदार पदी विजय होणे नाकारता येत नसल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments